साहित्य

जिंकुनी मरणाला | Jinkuni Maranala

120.00

कोणतेही लेखन वाचताना मन पुलकित झाल्याचा अनुभव आला किंवा ‘वाह, भले’ असे उद्‌गार मनोमन उमटले की, लेखकाच्या यशस्वितेची वेगळी पावती देण्याचे कारणच उरत नाही.

वसंतरावांचे लेखन वाचताना हा अनुभव मला अनेकदा आला.

त्यांचे सगळेच निबंध कसलेल्या नर्तकीच्या पदन्यासाप्रमाणे रुमझुमणारे आहेत.

हवा तो भाव क्षणात साकार करण्याचे सामर्थ्य त्यांच्या लेखणीत आहे.

संस्कृत व मराठी भाषांच्या संगमात भिजून चिंब झालेली त्यांची लेखणी परिच्छेदामागून परिच्छेद अशा प्रकारे फुलवीत जाते की, वाचकाला हा ताटवा अधिक मनोहारी होता की तो असा भ्रम पडावा.

– ना. ग. गोरे

Saleनवी पुस्तके

त्रिकोणी साहस | Trikoni Sahas

480.00

या पुस्तकाची कथा सुरू होते पृथ्वीपासून लाखो प्रकाशवर्षे दूर असलेल्या ‘श्वेतालिया’ नावाच्या परग्रहावर. या श्वेतालियाच्या सूर्यमालेत एक नव्हे, तर तब्बल चार सूर्य आहेत! या ग्रहावर ‘साहस श्वेतम’ नावाचा एक मुलगा राहतो, जो आपल्या 12 वर्षांच्या आयुष्यात (इच्छा असूनही) कधीही आपल्या शहराबाहेर गेलेला नाहीये. त्याच्या 12 व्या वाढदिवशी त्याला एक गूढ संदेश मिळतो आणि त्या संदेशाचा पाठपुरावा करताना तो अनेक नवनवीन रहस्यांमध्ये गुंतत जातो, अनेक अद्भुत प्रदेशांत जाऊन अनेक नवनवीन संकटांचा सामना करतो. या शोधमोहिमेत त्याला नवीन मित्रही मिळतात अन् शत्रूही. आजवर कधीही न अनुभवलेले नवीन खेळ, कला, कोडी (पझल्स), संगीत, नृत्य, खाद्यपदार्थ, भाषा, संस्कृती यांचा त्याला परिचय होतो. विश्वातील नवनवीन प्रदेशांत भ्रमंती करणारा साहस आपल्या साहसी कृत्यांनी एक दिवस संपूर्ण विश्वाला तारणार आहे की आपल्या उतावळ्या, उपद्व्यापी वृत्तीने गंभीर संकटे ओढवून घेऊन संपूर्ण विश्वाला मारणार आहे. तो नक्की काय करतो ते पुस्तकात वाचणेच योग्य ठरेल…

Saleनवी पुस्तके

एक्स्प्रेस पुराण | Express puran

160.00

उपजत कुतूहल घेऊन विनय हर्डीकर अनेक क्षेत्रांत गेली पाच दशके विहार करत आहेत. या दरम्यान ते जिथे रमतात, तिथे खोल बुडी मारून तळ पाहून येतात. आणि कालांतराने काठाशी बसून तो अनुभव आपल्या वाचकांशी साद्यंत संवादतात. यातून त्यांची उत्कट आत्मनिवेदनात्मक शैली साकारलेली आहे.

1981 ते 1986 या काळात अशीच बुडी त्यांनी इंग्रजी पत्रकारितेत मारली होती, ‘इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्रसमूहात फिरता शोधपत्रकार म्हणून. त्या अनुभवांचे पुराण ते इथे सांगत आहेत, अर्थात हे करताना आत्मनिष्ठ अनुभवकथनातून वर्तमानाचा इतिहास नोंदवण्याची बांधिलकी ते सोडत नाहीत.

या आग्रहातून आनंद, औत्सुक्य, फजिती, घालमेल, विषण्णता, रोमांच इत्यादी भावभावनांचा डौलदार स्वानुभव मांडतानाच ते तत्कालीन समाजातल्या आंतरसंबंधांची गुंतागुंत, भारतातल्या पत्रकारितेचे राष्ट्रीय व प्रादेशिक स्वरूप आणि इथल्या राजकीय-सामाजिक-आर्थिक व सांस्कृतिक निष्ठांचा अविरत सुरू असलेला झगडा यांचा (मर्यादित परंतु स्वयंपूर्ण) छेद वाचकांच्या जाणिवेत प्रतिरोपित करतात.

Saleनवी पुस्तके

द्रविड महाराष्ट्र | Dravid Maharashtra

60.00

भाषेच्या संबंधात मराठी भाषा संस्कृत कुळातली आहे हे ठरल्यावर तिची शब्दसंपदाही पूर्णतया संस्कृत कुळातूनच सिद्ध करणे क्रमप्राप्त मानले गेले. तमिळ कुळातील शब्दभांडाराशी तिची प्राथमिक तुलनाही झाली नाही. स्थळनामांच्याही अभ्यासात नवे पाऊल पडलेले नाही. वस्तुस्थिती मात्र वेगळीच दिसते. संस्कृत कुळावरून मराठीतले जे शब्द व्युत्पादिता येत नाहीत, त्यातले बहुसंख्य तमिळ असावेत. तसेच मराठी मुलुखातील बहुसंख्य स्थळनामांचा संस्कृत, प्राकृत, कानडी वा तेलुगू भाषांवरून अर्थ लागत नाही; तमिळवरून मात्र लागतो. खास महाराष्ट्राची म्हणून मानली गेलेली खंडोबा-विठोबासारखी महादैवते किंवा बोलाई-फिरंगाईसारखी लोकदैवते यांचाही इतिहास आणि अर्थ आपल्याला तमिळ आदिसाहित्यावरून चांगला उमगू शकतो. त्यामुळे, महाराष्ट्रादी नावांचे मूळ तमिळमध्ये शोधण्यास सबळ कारण आहे

Saleनवी पुस्तके

साने गुरुजींची जीवनगाथा | Sane Gurujinchi Jeevangatha

640.00

पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांना 24 डिसेंबर 1899 ते 11 जून 1950 असे जेमतेम पन्नास वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक आयाम होते; पण, कवी, लेखक, अनुवादक, संपादक, समाजसुधारक आणि स्वातंत्र्यलढ्यातील नेते अशी त्यांची सप्तरंगी ओळख अधिक गडद आहे. त्यांनी लिहिलेली लहान-मोठी अशी सव्वाशे पुस्तके प्रकाशित झालेली आहेत, त्यातील अर्ध्याहून अधिक पुस्तके आजच्या समाजमनाचाही ठाव घेणारी आहेत. साने गुरुजींच्या व्यक्तित्वाचे व कार्याचे वर्णन करण्यासाठी अनेक विशेषणे वापरता येतील, पण त्यांच्या केवळ साहित्याचा विचार करता ‘मानवी संस्कृतीचा सर्वश्रेष्ठ मराठी प्रवक्ता’ हे संबोधन अधिक योग्य ठरेल. अशा या गुरुजींची चरित्रे अनेक लहान-थोरांनी लिहिलेली आहेत, मात्र त्यांचे समग्र म्हणावे असे हे एकमेव चरित्र आहे. त्यांच्या धडपडणाऱ्या मुलांपैकी एक असलेले राजा मंगळवेढेकर यांनी हे लिहिले आहे. कुमार व युवा अवस्थेत त्यांना गुरुजींचा सहवास लाभला आणि त्यानंतरचे अर्धशतक त्यांनी गुरुजींचेच विचार-कार्य पुढे चालू ठेवले. गुरुजींच्या विचार-कार्याचा गाभा व आवाका समजून घेण्यासाठी फक्त एकच पुस्तक वाचायचे असेल तर ते कोणते, या प्रश्नाचे उत्तर ‘साने गुरुजींची जीवनगाथा’ हेच आहे.

     

परिवर्तनाचे दोन पाईक | Pariwartnache Don Paik

60.00

आजच्या विषयाचे मी दोन विभाग पाडणार आहे. विषयाची मांडणी मी अशी करू इच्छितो की, ज्या महत्त्वाच्या संकल्पना आमच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनामध्ये आहेत, त्या प्रत्येक संकल्पनेबद्दल न्या. रानड्यांचे विचार आणि फुल्यांचे विचार यांचा तौलनिक दृष्टीने परामर्श पहिल्या व्याख्यानात घ्यावा. आणि दुसऱ्या दिवशी आजच्या सामाजिक समस्यांच्या संदर्भात न्या. रानडे आणि जोतिबा फुले यांची संबद्धता काय आहे हे तपासून पाहावे. जोतिबा फुले आणि न्या. रानडे यांच्या विचारांची वर्तुळे काही ठिकाणी एकमेकांना स्पर्श करतात, तर काही ठिकाणी एकमेकांना छेद देतात. माझ्या व्याख्यानांमध्ये हे स्पर्शबिंदू आणि छेदबिंदू या दोहोंचाही मी विचार करणार आहे.

 

     

Saleनवी पुस्तके

विकास गीते | Vikas Geete

80.00

आज मराठीमध्ये हेतूपूर्वक लिहिलेल्या स्फूर्तिगीतांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे ‘मनोविकास’ ह्या सूत्राभोवती लिहिली गेलेली गाणी एकत्रितपणे उपलब्ध करणे हे महत्त्वाचे आहे. वेधगीतांमधून विवेकवादी विचार, विस्तारित भावना आणि विधायक वर्तन हा मनआरोग्याचा संदेश प्रभावीपणे पोहोचू शकतो. मी संगीताचे पद्धतशीर प्रशिक्षण घेतलेले नाही, याचा मला एक फायदा असा झाला की, त्यामुळे चाली अगदी सोप्या बांधल्या गेल्या. माझे संगीतशिक्षण सुरू असते ते ‘कानसेन’ म्हणूनच. पण, ह्या क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार-संगीत नियोजक, माझे मित्र-मैत्रिणी असल्यामुळे त्यांचा कलाप्रवास मी जवळून अनुभवतो आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करतो.

     

Saleनवी पुस्तके

एक मैफल | Ek Maifal

60.00

ग्वाल्हेर घराण्याची प्रख्यात गायिका म्हणून विदुषी नीला भागवत यांची भारतात व परदेशातही ओळख आहे. सुरुवातीला, संगीताच्या जोडीने त्यांनी नृत्य, नाट्य, या कलेच्या प्रांतात, तसेच मराठी साहित्य व समाजशास्त्राचा अभ्यास व काही काळ प्राध्यापकी अशी विविध क्षेत्रांत मुशाफिरी केली. पण पुढील टप्प्यांत संगीत हेच त्यांच्या जीवनाचं श्रेयस व प्रेयस बनलं असं दिसतं. एक प्रयोगशील, अनवट वाटा धुंडाळणारी गायिका, आपली डावी विचारसरणी व स्त्रीवादी भूमिका आपल्या गायन कलेतूनही सुस्पष्टपणे व्यक्त करणारी सर्जनशील कलाकार, अशी त्यांची प्रतिमा भारतात व परदेशांतही आहे. संगीत क्षेत्रात ही काहीशी दुर्मीळ बाबच म्हणावी लागेल. अशा समाजाभिमुख कलाकार व्यक्तित्वाचा वेध घेणं म्हणजे तिच्या जडणघडणीचा काळ व अवकाश यातील ताणे-बाणे समजून घेणं होय.

 

1 2 9