Sale

1,200.00

जनता पक्षाचा प्रयोग – खंड 1 ते 4 | Janata Pakshacha Prayog – Khand 1 te 4

1 मे 1922 ते 8 जानेवारी 1995 असे 72 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या मधु लिमये यांचे जन्मशताब्दी वर्ष नुकतेच संपले आहे. भारतातील समाजवादी चळवळीतील पहिल्या पिढीचे प्रमुख नेते व विचारवंत अशी त्यांची ओळख राहिली आहे. त्यांची मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये मिळून लहान-मोठी अशी तीन डझन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी 1994 मध्ये ‘Janata Party Experiment’ या शीर्षकाखाली इंग्रजीत 1200 पानांचा द्विखंडात्मक ग्रंथ लिहिला होता. तो बृहद् ग्रंथ मराठीत प्रथमच प्रकाशित होत आहे. वाचकांच्या सोयीसाठी मराठी अनुवाद चार खंडांत येत आहे. खंड 1 व 2 चे अनुवाद वासंती फडके यांनी, तर खंड 3 व 4 चे अनुवाद सुनिती जैन यांनी केले आहेत. मराठीतील प्रत्येक खंड तीनशे ते साडेतीनशे पाने यादरम्यान असून, प्रत्येक खंडाची किंमत 350 रुपये आहे. या अनुवादित ग्रंथाचे संपादन अमरेंद्र धनेश्वर व अनिरुद्ध लिमये यांनी केले आहे. 1975 ते 1980 या काळातील अत्यंत स्फोटक असे भारताचे अंतर्गत राजकारण आणि अखेर सत्तांतर यांचे अधिक चांगले आकलन करून घेण्यासाठी हे चार खंड वाचायला हवेत, संग्रही ठेवायला हवेत!

 

       

 

Share

खंड 1

1971 च्या निवडणुकीतील खासदारकी अलाहाबाद उच्च न्यायालयाने रद्दबादल ठरवल्यानंतर इंदिरा गांधींनी देशावर आणीबाणीरूपी हुकूमशाही लादली. ते 19 महिने भयाण काळरात्रीप्रमाणे होते. संसदेपासून प्रसारमाध्यमांपर्यंत लोकशाहीचे सर्व खांब भयाने लुळेपांगळे झाले होते. इंदिरा गांधींनी सर्व सत्तेचे कसे केंद्रीकरण केले आणि नवी हुकूमशाही राजवट कशी उभारली याचे तपशीलवार वर्णन मधु लिमयेंनी या खंडात केले आहे. आपण लोकप्रियतेच्या लाटेवर आरूढ आहोत, अशा भ्रमात राहून इंदिरा गांधींनी मार्च 1977 मध्ये निवडणुका घेतल्या आणि त्या सत्तेवरून दर फेकल्या गेल्या. या खंडात विजय प्राप्त केल्यानंतर जनता पक्षाला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागले याची चर्चा आहे. शिवाय आपण बदलत आहोत, अशी हूल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कशी दिली आणि पुन्हा तो आपल्या संकुचित विचारसरणीकडे कसा वळला याची हकिगतही यात आहे. राष्ट्रपतींच्या निवडणुकीचे राजकारण, चौकशी आयोगांचा बोजवारा, इंदिरा गांधींच्या हालचाली व डावपेच आणि राज्यविधानसभा निवडणुकांमधील जनता पक्षाच्या यशापयशाचा आलेख असा विस्तृत पट या खंडात आहे.
खंड 2
इंदिरा गांधींच्या हुकूमशाहीचा सामना करण्यासाठी जनता पक्ष निर्माण झाला होता. ‘आपापले स्वतंत्र अस्तित्व समाप्त करून एक पक्ष बनवलात, तरच मी निवडणुकीत प्रचार करायला उतरेन’ अशी अट जयप्रकाशांनी घातल्याने आणि जनमताचा प्रचंड रेटा असल्यामुळे संघटना काँग्रेस, भारतीय क्रांती दल, जनसंघ आणि समाजवादी असे विभिन्न विचारसणींचे चार पक्ष एकत्र आले आणि त्यातून बनलेल्या जनता पक्षाला निवडणुकीत घवघवीत यश संपादन करता आले. एकमेकांचे पाय न ओढता व एकमेकांवर कुरघोडी न करता सर्वसहमतीने जनता पक्ष आणि केंद्र सरकार चालवले असते, तरच ऐक्य टिकू शकले असते. पंतप्रधानपदावर मोरारजींची निवड करताना अथवा पक्षाध्यक्ष म्हणून चंद्रशेखरांची निवड करताना हेच तत्त्व अवलंबण्यात आले होते. मात्र घटकवाद अस्तित्वात होताच आणि दुहेरी निष्ठा बाळगणारा जनसंघ याबाबत सर्वाधिक दोषी होता. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संख्याबळाचा वापर करून जनता पक्ष आणि विविध राज्यांमधली सरकारे काबीज करणे हे जनसंघाचे उद्दिष्ट होते. त्यातून जनता पक्ष कसा पोखरला गेला हे या खंडात सांगितले आहे.
खंड 3
इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीमुळे भारतात हुकूमशाही राजवट निर्माण झाली होती. त्या दडपशाहीला उलथवून टाकण्यासाठी आपापसांतले मतभेद बाजूला सारून सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज होती. त्याप्रमाणे संघटना काँग्रेस, भारतीय क्रांती दल, जनसंघ आणि समाजवादी हे चार पक्ष एकत्र आले खरे; पण त्यांच्यातला एकोपा वरवरचा होता. एकीकडे केंद्र आणि राज्य पातळीवरचा घटक पक्षांमधला सत्तासंघर्ष, तर दुसरीकडे जनसंघ आणि इतर घटक पक्षांमधला वैचारिक संघर्ष यामुळे जनता पक्ष खिळखिळा होऊ लागला. हरियाणा, उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यांमधल्या मुख्यमंत्र्यांना वारंवार विश्वासदर्शक ठराव पास करण्यासाठी भाग पाडण्यात आले. त्यातून केंद्रात अस्थिरता निर्माण होईल, असा धोक्याचा इशारा लिमयेंनी दिला होता. पण विनाशाकडे नेणारा हा सत्तेचा खेळ थांबला नाही. त्यात चरणसिंग विरुद्ध मोरारजी हा सत्तासंघर्ष आणि राजनारायण यांच्या बडतर्फीचे वादग्रस्त प्रकरण यांची भर पडली. जुलै 1978 मध्ये मधु लिमयेंच्या भगीरथ प्रयत्नांनंतर फूट सांधली गेली. पण ही ओढून-ताणून आणलेली शांतता क्षणभंगुर ठरली.
खंड 4
विभिन्न विचारसरणीचे चार पक्ष लोकशाहीच्या रक्षणासाठी 1977 मध्ये एकत्र आले. त्यापैकी संघटना काँग्रेस, भारतीय क्रांती दल आणि समाजवादी हे तीन पक्ष स्वातंत्र्य चळवळीचा वारसा आणि मूल्ये मानणारे होते. जनसंघ मात्र पूर्णतः वेगळ्या विचारधारेशी निगडित असा धर्माधिष्ठित घटक पक्ष होता. या नव्या एकत्रित जनता पक्षाचे सरचिटणीस या नात्याने सर्वसंमतीच्या आधारे पक्ष चालवण्याचा आग्रह लिमयेंनी धरला. परंतु वैयक्तिक महत्त्वाकांक्षेतून निर्माण होणाऱ्या सत्तासंघर्षाने जनता पक्षाला ग्रासले. मग चरणसिंग आणि मोरारजी यांनी एकमेकांविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप केले. तेव्हा संसदीय पक्षातल्या संख्याबळाचा वापर करून जनाधार असलेल्या नेत्यांना सत्ताच्युत करू नये, असा आग्रह धरून लिमयेंनी फाटाफूट साधण्याचा निकराचा प्रयत्न केला, पण तो व्यर्थ ठरला. त्यामुळे सरकार ठप्प झाले आणि अखेरीस गडगडले. या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी इंदिरा गांधी सज्जच होत्या. ‘सरकार उनकी जो चला सके’ अशी घोषणा देत त्या 1980 ची निवडणूक जिंकून पुन्हा सत्तेवर आल्या आणि जनता पक्षाचा अनोखा प्रयोग संपुष्टात आला. या वादळी पर्वात प्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या मधु लिमयेंनी सादर केलेल्या इतिहासाचा हा खंड.
Weight 2 kg
Dimensions 14 × 10 × 21.5 cm
Size

M, S

Pages

1200

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “जनता पक्षाचा प्रयोग – खंड 1 ते 4 | Janata Pakshacha Prayog – Khand 1 te 4”

Your email address will not be published.