Lokmanya Tilak | लोकमान्य टिळक
₹560.00टिळकांच्या जन्मशताब्दी वर्षी, म्हणजे 1956 मध्ये अखिल भारतीय काँग्रेस समितीतर्फे आयोजित स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवणारे अ. के. भागवत व ग. प्र. प्रधान यांनी लिहिलेले टिळकांचे इंग्रजी चरित्र.


टिळकांच्या जन्मशताब्दी वर्षी, म्हणजे 1956 मध्ये अखिल भारतीय काँग्रेस समितीतर्फे आयोजित स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवणारे अ. के. भागवत व ग. प्र. प्रधान यांनी लिहिलेले टिळकांचे इंग्रजी चरित्र.
देशाला स्वातंत्र्य मिळाले, पण गांधीजींच्या स्वप्नातील ग्रामस्वराज्याचे काय हा प्रश्न अनिर्णित होता. त्या शोधप्रक्रियेचा भाग म्हणून 8 मार्च 1951 रोजी सर्वोदय संमेलन आणि तेलंगणाची यात्रा करायला विनोबा भावे निघाले. नलगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली या गावातील बैठकीत तेथील दलितांच्या समस्यांवर चर्चा चालू होती. तेव्हा रामचंद्र रेड्डी या व्यक्तीने त्यांच्या मालकीची 50 एकर कोरडवाहू आणि 50 एकर ओलिताची जमीन दान करण्याची घोषणा केली. त्या घटनेने ठिणगी पडली, त्या रात्री विनोबा झोपू शकले नाहीत. तो दिवस होता 18 एप्रिल 1951.
आणि मग दुसऱ्या दिवशीपासून सुरू झाले भूदान आंदोलन, नंतर त्याला ग्रामदानाची जोड मिळाली. तब्बल 13 वर्षे त्या आंदोलनाचा झंझावात देशातील विविध राज्यांतून चालूच राहिला, आणखी दशकभर त्याचा प्रभाव देशभर राहिला. त्या प्रक्रियेत एकूण 47 लाख एकर जमीन मिळाली आणि त्यातील 25 लाख एकर जमीन भूमिहीन शेतमजुरांना वाटली गेली. या संपूर्ण प्रक्रियेची कहाणी, शिवाय त्या आंदोलनाचे आणखी काय, किती व कसे परिणाम झाले, या सर्वांची अतिशय अभ्यासपूर्ण आणि तरीही कमालीची वाचनीय व रोचक अशी समीक्षा या पुस्तकात आहे.
1931 ते 2012 असे 80 वर्षांचे आयुष्य लाभलेले राम बापट अर्धशतकाहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात सक्रिय होते. त्यांची ओळख प्रामुख्याने, पुणे विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि सामाजिक व राजकीय संस्था-संघटनांचे खंबीर पाठीराखे अशी होती. पण त्यांना इतिहास, समाजशास्त्र, मानव्य शास्त्र, तत्त्वज्ञान इत्यादी विषयांत असलेली गती थक्क करणारी होती. शिवाय, साहित्य, नाटक, सिनेमा यांचे ते साक्षेपी समीक्षक होते. त्यामुळे व्हर्सटाइल जिनियस असे त्यांच्याबाबत म्हणता येते. त्यांच्या स्मृतीनिमित्त, 2013 ते 2023 या दशकभरात दरवर्षी एक याप्रमाणे व्याख्याने आयोजित करण्याचे काम मकरंद साठे व गजानन परांजपे या दोघांनी हाती घेतले व पार पाडले. त्या व्याख्यानमालेत देशभरातील विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांना निमंत्रित केले गेले. अभ्यासपूर्ण व मर्मग्राही अशी ती व्याख्याने इंग्रजीतून झाली. त्या व्याख्यानांचे अनुवाद व संपादन करून तयार केलेले हे पुस्तक आहे.
ग्रामीण भागातील एक विद्यार्थी, वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच ग्रामीण आरोग्याचा स्तर उंचावण्यासाठी काय करता येईल, यावर सक्रिय होतो. त्या दृष्टीने विविध उपक्रम आखतो. त्यातूनच पुढे ‘भारतवैद्य’, ‘हॅलो मेडिकल फाऊंडेशन’, ‘महिला बचतगट योजना’, ‘एकल महिलांचे सक्षमीकरण’ असे उपक्रम साकारतात. त्या स्थानिक ‘भारतवैद्य’ उपक्रमातूनच पुढे राष्ट्रीय पातळीवर ‘आशा’ साकारते. ‘व्यवस्थेसाठी माणूस नाही, तर माणसासाठी व्यवस्था’ हे ब्रीद कठोरपणे पाळत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ. शशिकांत अहंकारी आजन्म प्रयत्नशील राहिले. ग्रामीण आरोग्यात सुधारणा घडवण्यासाठी नवी दृष्टी देणारा त्यांचा जीवन प्रवास हृद्य तर आहेच, पण अनुकरणीयही आहे.
वीणा गवाणकर
विनोबा महाराष्ट्रात आले तोपर्यंत लाखो एकर जमीन दानात मिळाली होती. हजारो गावे ग्रामदान झाली होती.
भूदान-यज्ञादरम्यान अनेक विचार प्रकट झाले होते, अनेक कार्यक्रम पुढे आले होते. ही सगळी शिदोरी घेऊन विनोबा त्यांच्या प्रिय महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रापुढे त्यांनी हृदय मोकळे केले. यामुळेच त्यांच्या येथील अनेक भाषणांना वेगळ्याच जिव्हाळ्याचा स्पर्श आहे. या पदयात्रेतील त्यांच्या भाषणांच्या संपादनातून ‘महाराष्ट्रात विनोबा’ पुस्तकाचे चार भाग प्रकाशित झाले (1958-59).
या भाषणांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ती मराठीत आहेत. भारतभरच्या पदयात्रेत महाराष्ट्र आणि गुजरातचा अपवाद वगळता विनोबा हिंदीत बोलले. फक्त महाराष्ट्रात मराठीत. त्यांची मराठी वक्तृत्वशैली या पुस्तकामध्ये दिसते तशी साहजिकच अन्यत्र दिसत नाही. विनोबांच्या विविध विषयांवरील विचारांना संकलित-संपादित करून अनेक पुस्तके विभिन्न भाषांमध्ये तयार झाली आहेत. ती उपयोगी आहेतच. मात्र मूळ भाषणांमधील खुमारी त्यांच्यात असू शकत नाही.
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी, तरुण कार्यकर्त्यांसाठी आणि सर्वसामान्य वाचकांसाठी स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास इंग्रजीतील माझ्या पुस्तकापेक्षा अधिक सविस्तरपणे लिहावा, असे मला तीव्रतेने वाटले. राष्ट्र सेवादलात पूर्वी काम करताना स्वातंत्र्य लढ्याच्या कथांमध्ये रंगून जाणारे सेवादल सैनिक आणि कार्यकर्ते यांची आठवण मला झाली. त्यांच्याशी माझे जसे अतूट नाते होते, तसेच ना विविध आघाड्यांवर काम करणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांशी आणि सध्याच्या विद्यार्थीवर्गाशी जुळावे, अशी ओढ माझ्या मनात निर्माण झाली, त्यातूनच हे ‘स्वातंत्र्यसंग्रामाचे महाभारत’ लिहिले गेले.
1866 ते 1915 असे जेमतेम 49 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या गोपाळ कृष्ण गोखले यांचे सार्वजनिक आयुष्य तीन दशकांचे होते. नेक नामदार अशी त्यांची ओळख देशभर रूढ झाली. पण त्यांची सुरुवातीची ओळख सुधारकाग्रणी गो. ग. आगरकर व न्या. म. गो. रानडे यांचे शिष्य अशी होती. तर अखेरच्या काळातील ओळख मोहनदास करमचंद गांधी यांचे राजकीय गुरू अशी होती.
त्यांचे दहावे स्मृती वर्ष आले तेव्हा, म्हणजे 1924 मध्ये त्यांचे चरित्रलेखन स्पर्धा मुंबई विद्यापीठाने जाहीर केली. त्या स्पर्धेत पांडुरंग सदाशिव साने या 24 वर्षांच्या तरुणाने भाग घेतला, तेव्हा तो नुकताच एम.ए. झाला होता. त्या तरुणाने पुस्तक लिहायला सुरुवात तर लगेच केली, पण ते वाढत गेले आणि दरम्यान, स्पर्धेसाठी लेखन सादर करण्याची मुदत संपून गेली.
आणि मग ते हस्तलिखित, त्या तरुणाच्या दत्तो वामन पोतदार या शिक्षकाने एका प्रकाशकाकडे सोपवले. ते पुस्तक फेब्रुवारी 1925 मध्ये प्रकाशित झाले. नामदार गोखले यांचे विस्तृत म्हणावे असे ते पहिले चरित्र आणि त्या तरुणाचे प्रकाशित झालेले ते पहिले पुस्तक. त्यानंतर पाच वर्षांनी तो तरुण, संपूर्ण महाराष्ट्रात साने गुरुजी या नावाने ओळखला जाऊ लागला.