Saptahik Sadhana Diwali 2022 | साप्ताहिक साधना दिवाळी 2022
₹130.00साधना साप्ताहिकाचा दिवाळी अंक हा पूर्वीपासूनच वर्गणीदार वाचक नसलेल्या वाचकांमध्येही विशेष दखलपात्र ठरत आलेला आहे. पण मागील 15 वर्षे नियमितपणे बालकुमार दिवाळी अंक आणि मागील नऊ वर्षे युवा दिवाळी अंकही प्रकाशित होत आला आहे. साहजिकच, मुख्य दिवाळी अंकाच्या पानांची संख्या आणि त्यातील मजकुराची विविधताही कमी होत गेलेली दिसेल. पण हे तीन दिवाळी अंक एकत्रित पाहिले आणि वर्षभरात प्रसिद्ध होणारे अन्य पाच-सात विशेषांक पाहिले तर लक्षात येईल- पूर्वीच्या तुलनेत अधिक आशय-विषय येत असून, विविधताही जास्त आहे… साधनातील लेख अधिक शब्दसंख्येचे व गंभीर वैचारिक असतात, हा काही वाचकांच्या मनात दुरावा निर्माण करणारा प्रकार आहे. मात्र तसा आशय व तसे विषय प्रसिद्ध करण्यासाठीचे विचारपीठ म्हणून साधनाचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि ते आशय-विषय पेलवू शकतील अशा ताकदीचे वाचकही साधनाकडे अन्य माध्यमसंस्थांच्या तुलनेत जास्त आहेत. प्रस्तुत दिवाळी अंकाकडेही त्या दृष्टीने पाहिले जावे अशी अपेक्षा आहे! – संपादक, साधना साप्ताहिक
मुशाफिरी | Mushafiri
₹120.00अनेक तहेच्या शैक्षणिक जबाबदाऱ्या आणि कामांच्या निमित्त नीती बडवे यांनी जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, फ्रान्स, इटली, नेदरलँड, फिनलँड, डेन्मार्क, इस्राएल, झेक रिपब्लिक, टर्की, कॅनडा, अमेरिका आणि सिंगापूर इत्यादी देशांना भेटी दिल्या.
त्या भेटींचे अनेक रसभरीत वृत्तांत या पुस्तकात सामावलेले असल्यामुळे, प्रत्येक लेखात वाचकाला काहीतरी नवीन वाचायला मिळते. लिहिण्याच्या ओघात त्या-त्या देशामधील सांस्कृतिक वैशिष्ट्ये, भाषा, लोक, प्रेक्षणीय स्थळे, खाद्यसंस्कृती, प्रवासातील विलक्षण अनुभव आणि त्याचबरोबर मित्र-मैत्रिणींशी उत्स्फूर्तपणे वाढत गेलेल्या सुखद ऋणानुबंधांच्या कहाण्या, हे सर्व या पुस्तकात अतिशय हळुवारपणे गुंफले गेले आहे.
अशा ऋणानुबंधाच्या भावनिक ओलाव्यामुळे नीती बडवे मनाने केवळ पुणे किंवा महाराष्ट्रच नव्हे, तर भारताबाहेरील अनेक देशांशी एकरूप झाल्याचा प्रत्यय येतो. त्यांची लोकसंग्रह करण्याची हातोटी आणि मैत्री जतन करण्याची क्षमता पाहून वाचक थक्क होतील.
– राजन हर्षे (प्रस्तावनेतून)
जिंकुनी मरणाला | Jinkuni Maranala
₹120.00कोणतेही लेखन वाचताना मन पुलकित झाल्याचा अनुभव आला किंवा ‘वाह, भले’ असे उद्गार मनोमन उमटले की, लेखकाच्या यशस्वितेची वेगळी पावती देण्याचे कारणच उरत नाही.
वसंतरावांचे लेखन वाचताना हा अनुभव मला अनेकदा आला.
त्यांचे सगळेच निबंध कसलेल्या नर्तकीच्या पदन्यासाप्रमाणे रुमझुमणारे आहेत.
हवा तो भाव क्षणात साकार करण्याचे सामर्थ्य त्यांच्या लेखणीत आहे.
संस्कृत व मराठी भाषांच्या संगमात भिजून चिंब झालेली त्यांची लेखणी परिच्छेदामागून परिच्छेद अशा प्रकारे फुलवीत जाते की, वाचकाला हा ताटवा अधिक मनोहारी होता की तो असा भ्रम पडावा.
– ना. ग. गोरे
ज्वारीची कहाणी | Jwarichi Kahani
₹120.00यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने, 2022 या वर्षी मराठीतील ललित, वैचारिक, साहित्य प्रकारांत तीन तरुणांना अभ्यासवृत्ती प्रदान केली होती, त्यातील एक होता धनंजय सानप. या तरुणाने निवडलेला विषय होता ‘ज्वारी पिकाचा अभ्यास’. साधारणतः एक वर्षभर त्याने लायब्ररी वर्क आणि फिल्ड वर्क केले, त्यातून आकाराला आलेले हे पुस्तक आहे. अतिशय सुबोध पद्धतीने ज्वारी या पिकाची कहाणी त्याने सांगितली आहे. यामध्ये इतिहास आहे, वर्तमानही आहे आणि भविष्यातील वाटचालीसाठी दिशादर्शनही!
ज्वारी पिकाच्या संदर्भातील सर्व प्रमुख आयाम या पुस्तकातून पुढे येतात. त्यामुळे शेतकरी, राज्यकर्ते, धोरण आखणारे व ते राबवणारे आणि अर्थातच शेतीशी निगडित अभ्यास संशोधन करणारे यांना हे पुस्तक विशेष उपयुक्त वाटेल. मात्र सर्वसामान्य व जिज्ञासू मराठी वाचकांनाही हे पुस्तक रंजक व उद्बोधक वाटेल. कारण महाराष्ट्राच्या दैनंदिन जीवनातील मुख्य आहारात (ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ) ज्वारीचे स्थान अग्रभागी आहे.
नाही नाचणार आदिवासी आता | Nahi Nachnar Adivasi Aata
₹120.00हाँसदांच्या कथांमधला आणखी एक कमालीच्या धारिष्ट्याचा भाग म्हणजे, त्यांनी हिंदू उच्च वर्णीयांच्या मुजोरीबरोबरीनेच धर्मादाय कामांच्या नावाखाली ख्रिश्चन मिशनऱ्यांनी उभं केलेलं जाळं, त्यांची तथाकथित मूल्यशिक्षण व्यवस्था आणि त्यात फसलेला आदिवासी समाज पुढे आणताना जोल्हे म्हणजेच मुसलमान आणि त्यांनी केलेली घुसखोरी तसंच त्यांचं मूलवासी आदिवासींना अल्पसंख्याक करत नेण्याचं शिस्तबद्ध धोरण, हेही अधोरेखित केले आहे. शिवाय माध्यमांच्या आणि न्यायव्यवस्थेच्या निवाड्यांचाही लेखाजोखा आहेच. थोडक्यात, आपल्या धर्मनिरपेक्ष व लोकशाहीवादी देशाचे चार आधारस्तंभ (विधीमंडळ, प्रशासन, न्यायव्यवस्था, माध्यमे) यांची लक्तरे एकीकडे वेशीवर टांगली आहेत, तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर जाळं असणाऱ्या मिशनऱ्यांचे आणि विस्तारवादी मुस्लीम मानसिकतेचेही वाभाडे काढले आहेत. हिंदूंमधल्या ‘आहे रे’ वर्गाचे दांडगेपण तर आहेच!
Keshavaravanchya Mulakhati | केशवरावांच्या मुलाखती
₹120.006 जानेवारी 2020 रोजी पुणे येथील डेक्कन कॉलेजच्या स्थापनेचे 200 वे वर्ष सुरू झाले. त्या दिवशी भल्या पहाटे मी डेक्कन कॉलेज परिसरात फिरायला गेलो. तेव्हा 150 वर्षांहून अधिक वयाचे केशवराव भेटले, अगदी अनपेक्षितपणे. तेव्हा त्यांच्याशी झालेला संवाद मुलाखतीच्या स्वरूपात नंतरच्या साधना साप्ताहिकाच्या अंकात प्रसिद्ध केला. त्यानंतरच्या दोन वर्षांच्या काळात केशवरावांच्या आणखी दहा मुलाखती झाल्या, त्याच ठिकाणी आणि त्याच वेळी! केशवरावांच्या मुलाखती पूर्वनियोजित नव्हत्या, पण बहुतांश मुलाखती कोणता तरी एखादा विषय केंद्रस्थानी ठेवूनच झाल्या. तरुणाई, पत्रकारिता, आरक्षण, उदारीकरण पर्व, वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट, शिक्षण, असंसदीय भाषा, न्यायव्यवस्था, काँग्रेस-भाजप, निवडणूक आयोग इत्यादी.
केशवराव मुळात कमी बोलतात, संक्षिप्त उत्तरे देतात, त्यात प्रतिप्रश्नच जास्त असतात. त्या उत्तरात किंचितसा उपरोध असतो, तिरकसपणा असतो आणि समाज जीवनातील विसंगतीवर बोट ठेवून मर्मभेदी भाष्यही असते. मात्र प्रत्येक मुलाखत रंगात आली असतानाच, ‘चला, उशीर झालाय, निघतो मी’ या वाक्याने समारोप करतात. म्हणजे त्या शेवटच्या प्रश्नाचे उत्तर न देता निघून जातात. ते असे का करतात; त्यांना त्या प्रश्नाचे उत्तर देणे सोयीचे वाटत नाही, की देताच येत नाही ?



