चिखलाचे पाय | Chikhalache Pay
₹100.00डॉ. दिलीप शिंदे यांनी या पुस्तकात त्यांना वृद्धाश्रमात भेटलेल्या तेरा व्यक्तींची अनुभवचित्रे शब्दबद्ध केली आहेत. डॉ. शिंदे यांची लेखनशैली प्रवाही, प्रासादिक आहे. त्याचबरोबर त्यांच्या वृत्तीतील संवेदनशीलता अधिक भावणारी आहे. त्यांच्या स्वतःच्या प्रवृत्तीत ‘वृद्धाश्रम पासून ते ‘वृद्धाश्रमांची अपरिहार्यता’पर्यंत झालेली स्थित्यंतरे त्यांनी प्रामाणिक थेटपणाने नोंदवली आहेत. प्रत्येक अनुभवचित्र हे एक कथेचा घाट घेऊन येते. त्यामुळे ती वाचनीय आहेत. या पुस्तकाचा इत्यर्थ डॉ. शिंदे यांनी समारोपात अब्राहम हेशेल यांच्या एका वाक्यातून सांगितला आहे. जग बदलते आहे. विज्ञाननिष्ठ, व्यवहारनिष्ठ होत आहे. हे सगळे खरे असले तरी एक महत्त्वाची जाणीव अब्राहम यांच्या शब्दात – “जगाला आपली प्रगती साधण्यासाठी ज्ञान-विज्ञानाप्रमाणेच प्रेमाची व मानवतेचीही गरज आहे.” हे भानच या लेखनामागची आणि आत्मीय कार्यामागची खरी प्रेरणा आहे.
– प्रा. डॉ. तारा भवाळकर
एका कोंबड्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य | Eka Kombdyache Abhivyakti Swatantrya
₹100.00ही कहाणी आहे गब्रू नावाच्या कोंबड्याची, त्याच्या आरवण्यासंबंधीची. गब्रूच्या आरवण्यामुळे झोपमोड होते अशी तक्रार केली जाते. त्या वेळेस कोंबड्याच्या बाजूने उभी राहतात सृजन कट्ट्यावरची मुलं. ही मुलं गोष्टी ऐकतात, सांगतात आणि लिहितातही!
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं मोल त्यांनी ओळखलंय. चिकित्सक, संवादी वृत्ती. आणि संवेदनशीलता यामुळे या मुलांना परीक्षा, अभ्यास, शिकणे आणि एकूणच जगण्याकडे बघण्याची डोळस दृष्टी आहे. कोंबड्याच्या आरवण्याच्या नैसर्गिक अभिव्यक्ती हक्कावर गदा येण्याची वेळ येते तेव्हा, ही धडपडणारी मुलं पुढाकार घेतात. पुढे होतो नाट्यमय प्रवास… त्यातून कुमारवयातील ऊर्जेला योग्य वाट मिळते. आणि मग मुलंही मोठ्यांपुढे आदर्श निर्माण करतात, याचा वस्तुपाठ आपल्यासमोर येतो.
कादंबरी रंजक तर आहेच, पण थेटपणे उपदेश न करता कल्पना आणि विचार करायला लावणारी आहे. परिणामी, ही कलाकृती अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सांविधानिक मूल्ये याविषयी जाणीव जागृती करते. कादंबरीत आलेल्या लोककथा, लोकगीते आणि प्राणी, पक्षी, निसर्ग यामुळे एका वेगळ्या विश्वाची सफर घडते. संघर्ष, नाट्य, चमत्कार, अद्भुत प्रसंग यामुळे कुतूहल वाढते. कहाणी उत्कंठावर्धक होते, कथानक झपाटून टाकते…!
बिजली | Bijali
₹100.00सामाजिक तत्त्वज्ञान हे जर या कवीच्या काव्याचे प्रभावी वैशिष्ट्य, तर त्या तत्त्वज्ञानाचे स्वरूप कोणते हेही लक्षात घेणे जरुरीचे आहे. ‘बिजली’ तून व्यक्त होणारी जीवनदृष्टी प्रागतिक, व्यापक आणि सहानुभूतीमय आहे. प्रत्येक युगामध्ये सामाजिक प्रगतीचे एक सूत्र अनुस्यूत असते. इष्टानिष्टतेचा शब्दकूट कोणी कितीही पाडला तरी, ग्रीष्मातील वणव्याप्रमाणे हे सूत्र स्वतःच्या आवेगानेच सतत पुढे जात राहते आणि जाताना स्थितिनिष्ठेच्या जीर्ण गढ्यांचे दहन करून टाकते. हे सूत्र ज्याच्या ध्यानात येते, केवळ ध्यानात येत नाही तर आंतरिक भावनेने जो त्याचे ग्रहण करतो, त्याच्यासंबंधीची बौद्धिक निष्ठा व श्रद्वा ज्याच्या ठिकाणी निर्माण होते असाच कवी त्या युगधर्माचा उद्गाता आणि पुढील काळाचा प्रेषित होऊ शकतो:
श्री. वसंतराव बापट यांना हे सूत्र जाणवलेले आहे. ज्या प्रकारे जाणवायला हवे त्याच प्रकारे जाणवलेले आहे म्हणजे त्यात औट घटकेची उसनवारी नाही, तर आंतरिक निष्ठेतून उत्पन्न झालेला जिव्हाळा आहे; आत्मप्रत्ययाच्या ऐरणीवरून उठलेले स्फुल्लिंग आहेत. कवी समाजक्रांतीचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यातच आजच्या युगधर्माचा त्यांना साक्षात्कार झालेला आहे असे मी मानतो. प्रगतीचे मूलतत्व या दिशेवरूनच निश्चित होऊ शकते. वसंतरावांच्या काव्यामध्ये या तत्त्वज्ञानाच्या अनेक कला आपल्याला प्रकट झालेल्या दिसतात. किंबहुना त्यांच्या काव्याची प्रमुख प्रेरणा आणि त्याचे सामर्थ्य या जीवनदृष्टीमध्येच आहे.
वि. वा. शिरवाडकर (प्रस्तावनेतून)
आचार्य जावडेकर : पत्रे आणि संस्मरणे | Acharya Javadekar : Letters and Memoirs |
₹100.00एका पत्राचा अपवाद वगळता उपलब्ध सर्व पत्रे आचार्यांनी आपल्या पत्नीला लिहिलेली आहेत. त्यांच्या पिढीतल्या काही स्त्रियांनी आत्मचरित्रवजा लेखन केले असले तरी ती बहुतेक अत्यंत भक्तिभावाने त्यांनी आपल्या पतींची लिहिलेली चरित्रेच आहेत. एकूणच स्त्रियांच्या आत्मकथनपर लेखनांतून त्यांच्या पतीविषयीचाच पसारा जास्त असतो. मग त्या जुन्या जमान्यातल्या स्त्रिया असोत की नव्या जमान्यातल्या. मात्र, आजवरच्या पुरुषांच्या आत्मकथनपर लेखनांतून त्यांच्या पत्नीला अजिबातच स्थान दिसत नाही. क्वचित असले तरी अगदी पुसट अंधुक चित्रासारखे ! तत्कालीन पत्रव्यवहारांतूनही पत्नीविषयीचा भाव मोकळेपणाने व्यक्त झालेला दिसत नाही. आचार्यांसारख्या धीर-गंभीर वृत्तीच्या आणि समाजालाच आयुष्य वाहिलेल्या व्यक्तीबाबत तर ही बाब उंबराला फूल येण्याइतकीच दुर्घट म्हणावी लागेल.
परंतु योगायोगाने या सुमारे 21-22 पत्रांतून हे अघटित घडलेले दिसते. आचार्य जावडेकर या व्यक्तीचा आपल्या कुटुंबीयांविषयीचा, पत्नीविषयीचा भाव व्यक्त करणारा अस्सल पुरावा म्हणून ही पत्रे महत्त्वाची आहेतच. पण तत्कालीन दांपत्यजीवनातील दृढ परंतु अभिजात संयमी भावबंधाचे लेखन म्हणून त्यांचे महत्त्व अधिक आहे असे वाटते.
सुशीलाबाईंच्या लेखनातून दिसणारे तत्कालीन कौटुंबिक, सामाजिक जीवनाचे चित्र आणि विशेषतः स्त्रीजीवन हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील ध्येयनिष्ठ व्यक्तींच्या जीवनातील हे वास्तव लेखन समाजशास्त्राच्या अभ्यासकांनाही मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास आहे
तेजसी | Tejasi
₹120.00या संग्रहातील कविता सादर करताना वसंतरावांनी आपल्या समकालीन, समव्यवसायी साहित्यिकांना इशारा देऊन बजावले आहे… “ध्यानात ठेवा, ज्यांची मान ताठ असेल, ज्यांच्या व्यक्तित्वात पोलादाचे उभे-आडवे ताणेबाणे असतील, सत्याचा भार पेलताना ज्यांचा देह झुकला नसेल आणि कोणत्याही लोभासाठी ज्यांनी आत्मा विकला नसेल, त्यांनाच सरस्वतीच्या दरबारात आज आमंत्रण आहे.” आणीबाणीच्या काळात लेखक, कलावंतांची जी मुस्कटदाबी सुरू झाली होती, तिला सच्च्या लेखकाने व कलावंताने शरण जाता कामा नये, असे वसंतरावांना बजावायचे आहे. यात थोडीफार आढ्यता आहे असे कोणाला वाटेल. पण हा कवितासंग्रह वाचल्यानंतर तेवढी आढ्यता, कवीच्या ठिकाणी असायला हरकत नाही असेच वाचकांचे मत होईल.
– ना. ग. गोरे
शतकाच्या सुवर्णमुद्रा | Shatakachya Suvarmudra
₹120.00आधुनिक मराठी कवितेचे एक शतक सरले; दुसरे उदयाला येण्याचा हा क्षण आहे. उत्कर्ष आणि अपकर्ष यांची आंदोलने समतोल मनाने झेलून परंपरेचे भान मात्र जागृत ठेवायला हवे. या छोट्याशा पुस्तकाचा हेतू एवढाच आहे. आपला परामर्श सर्वसमावेशक नसला तरी प्रातिनिधिक मात्र असला पाहिजे, या दृष्टीने टाकलेली ही केवळ पहिली पावले आहेत. एका शतकाच्या वाटचालीचा हा बोलका आलेख आहे, गेल्या शतकाने उचललेल्या पावलांचे ठसे आज सुवर्णमुद्रांसारखे वाटतात. त्यांच्यावर नजर टाकून उज्ज्वल भविष्याचा वेध घ्यायला हवा.