सामाजिक

वैचारिक घुसळण | Vaicharik Ghusalan

280.00

जो वाचक आनंद करंदीकर यांना प्रत्यक्ष ओळखत नाही किंवा ज्या वाचकांना त्यांचे लिखाण सोडून त्यांच्याविषयी अन्य माहिती नाही, अशा वाचकाने हे पुस्तक वाचून त्यांच्या वयाचा अंदाज करावा. लेखक तरुण आहे म्हणावं तर एवढा अनुभव, अभ्यास, प्रगल्भता आणि शहाणपण लहान वयात कसं येईल असं वाटेल, लेखक वृद्ध आहे असं म्हणावं तर लेखनातील दृष्टीकोन, भाषाशैली, विचार अगदी तरुण आहेत. शिवाय, अनुभवाच्या व अभ्यासाच्या आणि त्यातून आलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर लेखक ‘कन्क्लुजन’ काढून रिकामा झालेला नाही. त्याने आणखी अभ्यासाचा व नवीन शिकण्याचा प्रवास थांबवलाय असं वाटत नाही.

     

झुंडीचे मानसशास्त्र | Zundiche Manasashastra

280.00

झुंडीचे मानसशास्त्र अवगत असणे, ही गोष्ट अनेक लोकांच्या दृष्टीने फायद्याची असते. जगातील मोठमोठे कर्तबगार पुरुष, धर्मप्रवर्तक, साम्राज्यांचे संस्थापक, भिन्न-भिन्न विचारसरणींचे निष्ठावंत अनुयायी, प्रसिद्ध राजकारणपटू हे सर्व जण प्रच्छन्न मानसविशारद होते. झुंडींची मानसिक जडण-घडण कशी असते, हे या सर्वांना जणू जन्मतः कळते. या उपजत आणि अचूक ज्ञानाच्या जोरावरच ही मंडळी स्वत:चे श्रेष्ठत्व प्रस्थापित करू शकतात. झुंडीचे मानसशास्त्र अवगत असणे, ही गोष्ट राजकारणामध्ये पुढारीपण करू इच्छिणाऱ्यांना निकडीची होऊन बसली आहे. हे ज्ञान असेल, तरच झुंडींवर ताबा चालवता येणे शक्‍य असते. अर्थात, ही गोष्ट वाटते तितकी सोपी नसते. तथापि, हे ज्ञान असेल तर निदान ती व्यक्ती झुंडीच्या आहारी तरी जात नाही.

वाचावे कसे हे शिकवण्यासाठी ‘नवी क्षितिजे’ हे त्रैमासिक दीर्घकाळ चालवणाऱ्या आणि थोडेच पण विशेष महत्त्वाचे गंभीर वैचारिक लेखन करणाऱ्या विश्वास पाटील यांनी लिहिलेले ‘झुंडीचे मानसशास्त्र’ हे पुस्तक दोन वेगवेगळ्या पुस्तकांवर आधारित आहे. त्या दोन पुस्तकांचे लेखक वेगवेगळ्या कालखंडातील, वेगवेगळ्या देशांतील आणि वेगवेगळ्या भाषांतील आहेत. त्यातील पहिले पुस्तक आहे ‘द क्राउड’, ल बाँ यांनी लिहिलेले हे पुस्तक मूळ फ्रेंच भाषेतील असून त्याचा इंग्रजी अनुवाद 1896 मध्ये प्रसिद्ध झाला. दुसरे पुस्तक आहे ‘द ट्रू बिलिव्हर’, एरिक हॉपर या अमेरिकन लेखकाने 1951 मध्ये हे इंग्रजी पुस्तक लिहिले आहे. विश्वास पाटील यांनी ती दोन पुस्तके अनुक्रमे ‘झुंडी’ आणि ‘सच्चा अनुयायी’ या स्वरूपात सुबोध मराठीत आणली, आणि ‘झुंडीचे मानसशास्त्र’ हे एकसंध पुस्तक तयार केले. हे दोन्ही भाग परस्परांना पूरक आहेत, एवढेच नव्हे तर परस्परांचा आशय व विषय पुढे घेऊन जाणारे आहेत. 1978 मध्ये या पुस्तकाची पहिली आवृत्ती जनपथ प्रकाशन, मुंबई यांच्याकडून आली आणि नवी आवृत्ती साधना प्रकाशनाकडून 2020 मध्ये आली. चार दशकांनंतरही हे पुस्तक अधिकाधिक प्रस्तुत ठरते आहे.
(पहिली आवृत्ती – जनपथ प्रकाशन, मुंबई. 1978)

            

जवाहरलाल नेहरू | Jawaharlal Nehru

280.00

जवाहरलाल नेहरू यांच्यासाठी स्वातंत्र्य हा जुन्या मार्गाचा शेवट नव्हता, नव्या वाटेचा आरंभ होता. त्याआधीचा त्यांचा व देशाचा प्रवास एका प्रदीर्घ व अंधाऱ्या वाटेवरील कष्टाचा, वेदनांचा व विजयाचा होता. स्वातंत्र्य हे त्यांच्यासाठी साध्य नव्हते, ते भविष्याच्या उभारणीचे साधन होते. आयुष्याची 27 वर्षे त्यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या धकाधकीत, तर त्यातली 10 वर्षे तुरुंगात (एकूण सात वेळा मिळून) काढली होती. ते डिसेंबर 1921 मध्ये प्रथम तुरुंगात गेले. त्यांचा अखेरचा तुरुंगवास 9 ऑगस्ट 1942 रोजी सुरू झाला, तो 1041 दिवसांचा होता. अखेरच्या कारावासानंतर दोन वर्षांनी ते देशाचे पंतप्रधान झाले आणि 16 वर्षे त्या पदावर राहिले. त्या काळात त्यांनी देशाच्या आधुनिकतेची, लोकशाही वाटचालीची व सर्वक्षेत्रीय प्रगतीची पायाभरणी केली. अशा या नेत्याचे चरित्र समजून घेतले पाहिजे, कारण एका मर्यादित अर्थाने ते देशाचेही चरित्र असते.

 

            

 

स्वातंत्र्यसंग्रामाचे महाभारत | Swatantryasangramache Mahabharat

280.00

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी, तरुण कार्यकर्त्यांसाठी आणि सर्वसामान्य वाचकांसाठी स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास इंग्रजीतील माझ्या पुस्तकापेक्षा अधिक सविस्तरपणे लिहावा, असे मला तीव्रतेने वाटले. राष्ट्र सेवादलात पूर्वी काम करताना स्वातंत्र्य लढ्याच्या कथांमध्ये रंगून जाणारे सेवादल सैनिक आणि कार्यकर्ते यांची आठवण मला झाली. त्यांच्याशी माझे जसे अतूट नाते होते, तसेच ना विविध आघाड्यांवर काम करणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांशी आणि सध्याच्या विद्यार्थीवर्गाशी जुळावे, अशी ओढ माझ्या मनात निर्माण झाली, त्यातूनच हे ‘स्वातंत्र्यसंग्रामाचे महाभारत’ लिहिले गेले.

     

व्यक्ती आणि व्याप्ती | Vyakti Ani Vyapti

280.00

शिक्षक, प्राध्यापक, कार्यकर्ता, पत्रकार, लेखक, संपादक आणि समीक्षक असे प्रमुख आयाम असलेल्या विनय हर्डीकर यांच्या लेखनकार्याचे विशेष महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी लिहिलेली व्यक्तिचित्रे. मात्र रूढार्थाने लिहिली जातात तशी ही व्यक्तिचित्रे नसतात, त्यांना व्यक्तिविमर्श म्हणणेच योग्य ठरेल. कारण त्या-त्या व्यक्तीच्या विचारांचा वा कार्याचा गाभा व आवाका या लेखनाच्या केंद्रस्थानी असतो. त्यामुळे कोणाही वाचकाच्या मनात त्या व्यक्तिविमर्शांचा सखोल ठसा उमटतो; इतका की ती व्यक्ती म्हणजे विनय हर्डीकरांच्या लेखात चित्रित झाली आहे तशीच असणार, असा समज त्या व्यक्तीला न ओळखणाऱ्यांचा होतो. आणि त्या व्यक्तीला आधीपासून ओळखत असणाऱ्या वाचकांना वाटते, आपल्याला आता कुठे ही व्यक्ती नीट समजली आहे.

         

दृष्टी आरोग्यक्रांतीची | Drushti Aarogyakrantichi

240.00

ग्रामीण भागातील एक विद्यार्थी, वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच ग्रामीण आरोग्याचा स्तर उंचावण्यासाठी काय करता येईल, यावर सक्रिय होतो. त्या दृष्टीने विविध उपक्रम आखतो. त्यातूनच पुढे ‘भारतवैद्य’, ‘हॅलो मेडिकल फाऊंडेशन’, ‘महिला बचतगट योजना’, ‘एकल महिलांचे सक्षमीकरण’ असे उपक्रम साकारतात. त्या स्थानिक ‘भारतवैद्य’ उपक्रमातूनच पुढे राष्ट्रीय पातळीवर ‘आशा’ साकारते. ‘व्यवस्थेसाठी माणूस नाही, तर माणसासाठी व्यवस्था’ हे ब्रीद कठोरपणे पाळत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ. शशिकांत अहंकारी आजन्म प्रयत्नशील राहिले. ग्रामीण आरोग्यात सुधारणा घडवण्यासाठी नवी दृष्टी देणारा त्यांचा जीवन प्रवास हृद्य तर आहेच, पण अनुकरणीयही आहे.

वीणा गवाणकर

 

जनांचा प्रवाहो चालिला | Janancha Pravaho Chalila

240.00

जॉर्ज ऑर्वेलच्या ‘होमेज टू कॅटॅलोनिया’ या पुस्तकाने माझ्या त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. स्पॅनिश यादवी युद्धात ऑर्वेल सैनिक म्हणून गेला खरा, पण बार्सेलोनाच्या डोंगराळ भागात युद्धाचा फारसा जोरच नव्हता. गोळीबार करण्याचे प्रसंगसुद्धा हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच त्याच्या वाट्याला आले. तरीही स्वतःचे अनुभव सांगायचे, त्यांचं विश्लेषण करायचं, निरीक्षणे व निष्कर्ष नोंदवून ठेवायचे असे ठरवून एक अतिशय वाचनीय पुस्तक त्यानं लिहिलं. यादवी युद्धामुळे दुभंगलेला स्पेनचा समाज त्याच्या शब्दांमधून साकार झाला, मूर्त झाला.

मी तेच तंत्र अनुसरायचं ठरवलं. सगळं खरं सांगायचं, मोकळेपणाने सांगायचं आणि त्याचा विचार करायचा व मतं मांडायची एवढीच शैली मी वापरली. कोणताही विशिष्ट फॉर्म डोळ्यांपुढे ठेवला नाही. त्यामुळे एका मनमोकळ्या आत्मशोधाचं स्वरूपही आपोआप व सावकाश, पण निश्चितपणे येत गेलं. परिणामी, व्यक्तिस्वातंत्र्य, आविष्कार स्वातंत्र्य, लोकशाही, प्रामाणिकपणा व सहानुभूती या मूल्यांचा मी निष्ठा म्हणून स्वीकार कसा करीत गेलो, हेही तपासून पाहण्याची गरज मला जाणवू लागली.

नामदार गोखले चरित्र | Namdar Gokhale Charitra

240.00

1866 ते 1915 असे जेमतेम 49 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या गोपाळ कृष्ण गोखले यांचे सार्वजनिक आयुष्य तीन दशकांचे होते. नेक नामदार अशी त्यांची ओळख देशभर रूढ झाली. पण त्यांची सुरुवातीची ओळख सुधारकाग्रणी गो. ग. आगरकर व न्या. म. गो. रानडे यांचे शिष्य अशी होती. तर अखेरच्या काळातील ओळख मोहनदास करमचंद गांधी यांचे राजकीय गुरू अशी होती.

त्यांचे दहावे स्मृती वर्ष आले तेव्हा, म्हणजे 1924 मध्ये त्यांचे चरित्रलेखन स्पर्धा मुंबई विद्यापीठाने जाहीर केली. त्या स्पर्धेत पांडुरंग सदाशिव साने या 24 वर्षांच्या तरुणाने भाग घेतला, तेव्हा तो नुकताच एम.ए. झाला होता. त्या तरुणाने पुस्तक लिहायला सुरुवात तर लगेच केली, पण ते वाढत गेले आणि दरम्यान, स्पर्धेसाठी लेखन सादर करण्याची मुदत संपून गेली.

आणि मग ते हस्तलिखित, त्या तरुणाच्या दत्तो वामन पोतदार या शिक्षकाने एका प्रकाशकाकडे सोपवले. ते पुस्तक फेब्रुवारी 1925 मध्ये प्रकाशित झाले. नामदार गोखले यांचे विस्तृत म्हणावे असे ते पहिले चरित्र आणि त्या तरुणाचे प्रकाशित झालेले ते पहिले पुस्तक. त्यानंतर पाच वर्षांनी तो तरुण, संपूर्ण महाराष्ट्रात साने गुरुजी या नावाने ओळखला जाऊ लागला.

 

   

1 2 3 4 11